Thursday, May 25, 2023

राष्ट्रसंत तुकडोजीची ग्रामविकास दृष्टी



ग्राम तसा देश

१. गावचि भंगता अवदशा

ग्राम हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्ष।

गावचि भंगता अवदशा । येईल देशा ।। (ग्राम १.४९)

ग्राम ही विश्वाची लहानशी प्रतिकृती आहे. विश्वात जशी नाना वृत्तीची जनता वास करते तशीच जनता गावात आहे, विश्वात जशी विविध प्रकारची घरे आहेत तशीच विविधतेने नटलेली घरे ग्रामात आहेत. विश्वात जसे निसर्ग सौंदर्य आहे तसेच ग्रामात आहे. विश्वात सर्वजातीचे, सर्वपंथाचे अन् सर्व धर्माचे अनुयायी आहेत तसेच ग्रामात आहेत, विश्वात जसे नाना प्रकारचे व्यवसाय करणारे लोक आहे तसेच ग्रामात आहेत. विश्वात श्रीमंत-गरीब, मालक-मजूर आहेत तसेच ग्रामात आहेत. हे विश्व जसे विविध कलांने नटलेले आहे तसेच ग्रामही विविध कलांनी नटलेले आहे. म्हणूनच वं. महाराज ग्राम हा विश्वाचा नकाशाच आहे' असे मोठ्या आत्मविश्वासाने या विश्वातील लोकांना ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगत आहेत.

२. गाव हा देशाचा पायाभूत घटक

देश हा विश्वाचा घटक आहे आणि ग्राम हा आपल्या देशाचा घटक आहे. जगातील बहुतांश देशात ग्राम हाच घटक आहे. आपल्या भारत देशात सात लाख खेडी आहेत अन् सुमारे चौसष्ट प्रतिशत जनता खेड्यातच राहात आहे. म्हणूनच गाव जसे असेल तसेच देशाचे रूप दिसेल. गाव उन्नत असेल तर देश उन्नत होईल अन् गाव अवनत असेल तर देश अवनत राहील. गाव हाच देशाचा पायाभूत घटक आहे. गावचि जरी उत्तम नसेल । तरि देशाचे भवितव्य ढासळले ||(१.५२) याची आठवण ग्रामगीता करून देवून या देशातील नागरिकांना देशौन्नतीचा पाठ शिकवित आहे.

३. गाव भंगता कामा नये

गाव ही जणु देशाच्या इमारतीची वीट आहे. एक-एक वीट उत्कृष्टपणे जोडावी लागते, तेव्हाच इमारत उभी होते. त्या इमारतीला सफेदी केली, रंगरंगोटी दिली की ती सुंदर दिसते. तसेच प्रत्येक देशाचे आहे. गाव भंगले की देश भंगल्याशिवाय राहणार नाही, गाव ओसाड पडले, गावात रान माजले, गाव दुभंगले तर सारा देश दुभंगेल एवढेच नव्हे तर ग्रामगीतेच्या मते गाव भंगताच देशात अवदशा येईल म्हणून गाव भंगता कामा नये, गावात अवदशा येणार नाही याची काळजी या देशातील प्रत्येक नागरिकाने घेतलीच पाहिजे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठ्या कळकळीने आम्हास पन्नास वर्षापूर्वीच सांगितले आहे.

ग्रामगीता ही ग्रामावरची प्रथम गीता आहे. ग्रामविकासासाठीच राष्ट्रसंतांनी ग्रामगीता हा युगग्रंथ लिहिला. आतापर्यंत या विश्वात कहाण्या सांगणाऱ्या अनेक गीता लिहिल्या गेल्या. वं. महाराज ग्रामगीतेत म्हणतात-कृष्णगीता, रामगीता । हंसगीता, हनुमंत गीता । शिवगीता, अवधूतगीता । कथिल्या कोणी ||(१.६९)गुरुगीता, गणेशगीता। पांडवगीता, भगवद्गीता । देवगीता, देवीगीता । सर्व झाल्या ||(१.७०)सर्व देवगीता, देवीगीता झाल्यात परंतु ग्रामगीता ही ग्रामाची दशा सांगणारी प्रथम गीता होय.

४. ग्रामाची कहाणी सांगणारा महात्मा

'विश्वब्रह्म' बोलणारे हजारो नव्हे लाखो झालेत परंतु ग्रामाची कहाणी सांगणारे कुठेच दिसले नाहीत. 'जाणावे ग्राम हेचि मंदिर ।ग्रामातील जन सर्वेश्वर' हे सांगणारे कुठेच भेटले नाहीत. ज्याच्या श्रमावर सारे जगतात त्या ग्रामनाथाविषयी सविस्तर बोलण्याची इच्छा कोणास झालीच नाही. राष्ट्रसंत तुकडोजी हेच असे एक महात्मा विसाव्या शतकात झाले की त्यांनी 'ग्रामनाथाच्या श्रमास प्रतिष्ठा मिळो' यासाठी ग्रामावरून ग्रामगीता सांगीतली आणि वास्तविकतेचे दर्शन करून दिले. ग्रामगीता आणि ग्रामनाथ यांचे त्यांनी नातेच जोडून दिले. ग्रामविकासाला गती न येण्याची कारणे विस्तृतपणे साध्या, सोप्या भाषेत समजावून सांगितली आणि ग्रामविकासासाठी आवश्यक उपाय सुचविले. जसे ग्राम जीवन असेल तसाच हा देश घडेल असे ग्रामीण जीवन विद्यालयात अध्ययन केलेल्या या महापुरुषाने इशारा दिलेला आहे.

महाराज १९४९ सालच्या मे महिन्यात लिहिलेल्या एका लेखात म्हणतात,‘“विश्व विद्यालय में मैने अभ्यास जरूर किया है, परंतु ग्रामीण जीवन काही वह विद्यालय मैंने चुन लिया था।"

५. ग्रामगीता ग्रामनाथालाच अर्पण

ग्रामगीता ज्या ग्रामनाथाच्या उत्कर्षासाठी लिहिली त्याच ग्रामनाथाला ती अर्पण केली. ती ग्रामनाथालाच कां बरं अर्पण केली असावी याचे कारणही राष्ट्रसंतांनी स्पष्ट केले आहे. पहिले कारण सर्व जगातील लोकांना अन्न-वस्त्र- पात्र देणारा ग्रामनाथ आहे परंतु स्वतः दुःखच भोगतो आहे. त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा इतर व्यवसायिक देत नीह, या उलट आम्ही बौद्धीक श्रम करणारे श्रेष्ठ आहोत असा त्यांनी समज करून घेतलेला आहे. 'कष्ट करोनि महाल बांधसी। परि झोपडीहि नाही नेटकीशी' हा आजही वस्तुस्थितीच आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी याच ग्रामनाथांनी लढा दिला होता. ब्रिटीशाच्या नोकरांनी तर ब्रिटीशांचीच बाजू घेतली होती. ब्रिटीश कंपन्यावर अवलंबून असलेल्या उद्योगपति अन् व्यापाऱ्यांनी ब्रिटीशांनाच साथ दिली होती. नोकरांनी नोकऱ्या सोडल्या नाहीत अन् व्यापाऱ्यांनी व्यापार सोडलाच नाही. ब्रिटीश सत्तेशी खरा लढा ग्रामनाथांनीच दिला. अशा ग्रामनाथाच्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, त्याचेकडे सकळांचे लक्ष वळो यासाठीच राष्ट्रसंतांची ग्रामगीता आहे.' 'मित्रत्व नांदो त्रैभूवनी' ही राष्ट्रसंतांची इच्छा आहे. ग्रामात मित्रत्व राहिले की देशात मित्रत्व राहील. ग्राम तसाच देश बनेल यात शंकाच नाही. ग्राम तसाच देश होईल याची जाणीव शासक-प्रशासक, उद्योगपति व्यापारी-मजदूर यांना होणे ही आजही गरज आहे. ग्रामगीतेतील विचार या दृष्टीने विस्तारित करीत आहे.

जय गुरु 🚩🚩

लेखक - प्रा. रघुनाथ कडवे

                           संकलन - अमोल कडवे

(टीप  -  लेख वाचल्यावर आवडल्यास पुढे पाठवू शकता, मला आपली प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स वर नक्की कळवा.)

Sunday, May 7, 2023

युगाचार्य स्वामी विवेकानंद

 


युगाचार्य स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीतील अध्यात्मक्षेत्रातील स्वयंप्रकाशी ताऱ्यासारखे होते. त्यांचा जन्म बंगालमधील कलकता शहरात १२ जानेवारी १८६३ रोजी दत्त घराण्यात झाला. त्यांचे पिताजी विश्वनाथजी माता भुवनेश्वरीदेवी. स्वामीजीचे जन्मनाव नरेंद्र दत्त कुटुंब हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्याचा परिणाम नरेंद्रच्या बालमनावर झाला. लहानपणापासूनच नरेंद्रची वृत्ती चिकित्सक होती. साधु- संन्यासी दिसताच त्यांना प्रश्न विचारायचे. कोणी काही कोणी काही उत्तरं गायचे त्यांचे त्यामुळे समाधान होत नव्हते. त्यामुळे नास्तिकतेकडे नरेंद्रनाथ वळत होते. एकदा त्यांची भेट श्रीरामकृष्ण परमहंसाशी झाली. त्यांनी प्रश्न केला महाराज, आपला ईश्वरावर विश्वास आहे काय ? 'श्रीरामकृष्ण तात्काळ म्हणाले 'होय' 'महाराज आपण त्याच्या अस्तित्वासंबंधी काही प्रमाण देऊ शकाल काय ? 'होय'. ते प्रमाण कोणते ? प्रमाण हेच की मी तुला जसा आपल्यासमोर बघतो आहे. त्यालाही अगदी तसाच बघत आहे. या उत्तराने नरेंद्रनाथ फार प्रभावित झाले. त्यांनी श्रीरामकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. नरेंद्रनाथ पुढे कॉलेजमध्ये शिकायला गेले परंतु त्यांचे तिकडे लक्ष लागेना. ते दक्षिणेश्वरला श्रीरामकृष्णाकडे सतत जावू लागले. अध्यात्मसाधना करू लागले. नरेंद्रनाथाचे ते स्वामी विवेकानंद झाले. केवळ अध्यात्मसाधक राहता ते परिव्राजक झाले. पुढे स्वामीजी १८९३ च्या सप्टेंबर महिन्यात शिकागो येथील धर्मपरिषदेत गेले. त्या परिषदेत माझ्या भगिनींनो आणि बंधुनो वा प्रेमभावनेच्या शब्दांनी सारा जनसमुदाय हेलावून सोडला. अमेरिकेत त्यांची विविध विषयावर समर्पक व्याख्याने झाली. युरोप खंडातही त्यांची भाषणे झालीत. भारतात परत आल्यावर आपल्या गुरुदेवाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी श्रीरामकृष्ण मिशनची स्थापना केली. अशा या युगाचार्यानि वयाच्या ३९ व्या वर्षीच जुलै १९०२ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. त्यांनी नश्वर देह सोडला तरी त्यांचे अमर वाङ्मय लाखो लोकांना मार्गदर्शन करीत आहे. सत्कार्याची प्रेरणा देत आहे.

मुल्या :-  त्याग, वैराग्य, वक्तृत्व, गुरुनिष्ठा

लेखक
प्रा. रघुनाथ कडवे

Saturday, May 6, 2023

भगवान महावीर


                   भगवान महावीर
   सदाचाराचा ध्वज हाती घेवून त्यागपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या भगवान महावीरचा जन्म कुंडपूर नगरीत इ. स. पूर्वी ५९९ साली चैत्र शु. त्रयोदशीस झाला. त्याच्या मातेचे नाव त्रिशला व पित्याचे नाव सिद्धार्थ सिद्धार्थ हा क्षात्रतेजयुक्त असा राजा होता. भगवान महावीराचे जन्म नाव वर्धमान, वर्धमान बालक असतानाच्या लीला प्रसिद्ध आहेत. वर्धमान हा अतिशय निर्भिड व धैर्यशाली होता. भीति हा शब्दच त्याच्या जीवनात नव्हता. बालपणी एका उन्मत्त हत्तीला त्याने नमविले होते. त्याची ती बहादुरी पाहून सारे त्याला 'महावीर' म्हणू लागले.आपल्या सुपुत्राने विवाह करून गृहस्थाश्रमी व्हावे असे त्रिशला व सिद्धार्थ यांना वाटत होते परंतु महावीराने यास नकार दिला. मोहमायेच्या बंधनात राहणे त्यास पसंतच नव्हते. महावीर वैरागी होवू इच्छित होते.
    वयाच्या तिसाव्या वर्षीच त्यांनी सर्वसंग परित्याग केला व संन्यासी झाले. संन्यास घेतल्यानंतर कठोर तपोसाधना केली व ज्ञान प्राप्त करून घेतले. तपोसाधनेच्या काळात त्यांचा बराच छळ झाला परंतु आत्मसंयमी महावीराने त्या विरूद्ध कधीच ब्र काढला नाही. कुसारग्राम येथे त्यांच्यावर बैल चोरल्याचा आरोप केला. ढोंगी म्हणून निर्भत्सना केली परंतु महावीराने सारे सहन केले. महावीर इतके विरक्त होते की ते दिगंबर अवस्थेत फिरत, त्याच अवस्थेत राहात. स्वतःजवळ कोणतेही वस्त्र वा भांडे नसायचे, ते हातावरच भाकर घेवून खात, दिवसातून एकदाच जेवत. पाणी सुद्धा जेवणाचे वेळीच पित. त्यांनी आयुष्यभर कठोर नियमांचे पालन केले व अनुयायांना तेच नियम पालन करण्याचा उपदेश केला.
      महावीराचा पहिला शिष्य गौतम इन्द्रभूमि, त्यानंतर हजारो शिष्य झाले. दरवर्षी चातुर्मास्य करण्याची प्रथा पाडली. महावीराचे ज्ञान, वैराग्य पाहून त्यांना लोक तीर्थकर म्हणू लागले. ज्ञानप्राप्तीनंतर महावीरांने जैन धर्माचा ३२ वर्ष प्रचार-प्रसार केला. असे हे तीर्थकर वयाच्या ७१ व्या वर्षी पावापुरी येथे इ.स. पूर्व ५२५ च्या कार्तिक मासात निर्वाण पद पावते झाले त्यांची ज्ञान ज्योती अद्यापही चहुकडे प्रकाशित होवून सम्यक ज्ञान प्रदान करीत आहे. त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात करावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
 
लेखक
प्रा. रघुनाथ कडवे 

राष्ट्रसंत तुकडोजीची ग्रामविकास दृष्टी

ग्राम तसा देश १. गावचि भंगता अवदशा ग्राम हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्ष। गावचि भंगता अवदशा । येईल देशा ।। (ग्राम १.४९) ग्राम ही ...